Saturday, August 15, 2009

सावळ्याचे मरण...!!

आपल्या मनात असणा-या भावनांचा मान ठेवतच कधी कधी पुराणाकडे इतिहास म्हणून बघताना काही वेगवेगळ्या गोष्टी दिसू शकतात. यामधे भावना दुखाविण्याचा हेतू नसतोच.... असते ती कवि कल्पना... ईश्वराला साक्षी ठेवत त्याच्या अवतारातील काही मानवी पदर उलगडाण्याची.......

सावळ्याचे मरण...!!
एक प्रश्नचिन्ह..!!

फ़ाळभर घुसलेल्या भाल्यासारखे
रूतुन बसले आहे
आपल्या सर्वांच्याच हॄदयात..!!
कर्मण्येवाधिकारस्ते....
पाठ करताना नाही कळलं...
पण अर्थ कळाला आणि मस्तक भणभणलं....
सुभद्राहरण, जरासंधाचा वध
पादाक्रांत केलेला मगध...!!
एकमेवाद्वितीय कुरू घराण्यावर घातलेली मोहिनी.....
आणि यशस्वी केलेले सारथ्य...
भारतातल्या महाभारताचे.....!!!
कर्मण्येवाधिकारस्ते..???
नसता मेला जयद्रथ...
नसता आला शिख्ंडी तर
देवव्रतासमोर नागडे झाले असते
सावळ्याचे पांडव..!!
राधेय तुडवला गेला आणि द्रौपदी बटीक होयची वाचली..
सारं माफ़ असतचं तिथे... मान्य..
पण झेंडा कशाला मग.. कर्मण्येवाधिकारस्तेचा..?
फ़ेडायला लागलं त्याला..
कोणा भिल्लाच्या बाणाच्या टोकावर बसुन यम आला
क्षिरसागरातले सुदर्शन परत नेण्यासाठी...
ठिपकत ठिपकत मेला माझा सावळा....
यशोदेची मायेची फ़सवणुक
राधेची समाजातली मानहानी...
हजारो श्वासांच्या कुरूक्षेत्रामधल्या आहुती ...
सारं सारं भोवलं त्याला..
समोर बुडाले यादव...
गंजुन गेलं सुदर्शन...
सडुन गेली बासरी...
परक्या हाती मरणं..
आणि बेवारस प्रेतासारखी विल्हेवाट..!!!!!!
असा शेवट महाभारताच्या विश्वकर्म्याला..?
पटत नाही ना..
सत्य आहे......
आपण षंढ.... डोळे झाकुन बसलेलो सारे....
स्विकारायला हवं हेही रूप माझ्या
लाड्क्या सावळ्याचं....!!

No comments:

Post a Comment