Saturday, August 15, 2009

भावना..

आसवांना नाव नाही, भाव आहे
पापण्यांचा चिंब ओला गाव आहे

आठवात मोहरते, भान माझे
सावलीची, मावळती, धाव आहे

पैंजणात बावरले श्वास थोडे
मोग-यात गोंदलेले नाव आहे

या खळ्यांत ओल जणू गुंतलेली
मारव्यात गुंफ़लेला घाव आहे....

संध्याकाळ..

संध्याकाळ.. प्रत्येकाच्या मनातली निराळी !!


अल्लड रुप घेणारी.....

कधी बावरी, कधी लाजरी
असते संध्याकाळ....
कधी नाचरी, कधी बोचरी
असते संध्याकाळ....

कधी पूरिया, कधी मारवा
गाते संध्याकाळ....
कधी आठवे, कधी आसवे
न्हाते संध्याकाळ....

कधी अल्लड, कधी झिम्मड
होते संध्याकाळ....
कधी निखार, कधी फ़ुल्लार
बनते संध्याकाळ.....

तुझ्याचसाठी, तुझी होउनी
येते संध्याकाळ......
निमीषामधे, येते वेडी
जाते संध्याकाळ.......


उंबरठ्याची आठवण करुन देणारी..

ग सांज बावरे
तू ये !!

हुरहुरता श्वास
काहुरता भास
झाकोळती सय बनूनी ये !!

थरथरता ठेका
भिरभिरता झोका
रेंगाळता नाद बनूनी ये !!

सावलीची काया
माउलीची माया
उंब-याचा साज बनूनी ये !!

Miss U...!!!

आकाशाशी बोलताना
सागराकडे बघत.....
वा-याच्या कानात
सांगतेस तू..........
सावळ्याशी बोलताना
सावलीकडे बघत
सानिकेच्या सुरात
सांगतेस तू........
....... माझ्या मनाच पाखरु
....... भाबडं वासरु...miss U !!

आसवांशी खेळाताना
आठवांना हसवत....
पापणीच्या पदरात
सजतेस तू...........
खळ्यांमधे लाजताना
कळी बनून सजताना
हुंदक्याच्या धुक्यात
बोलतेस तू.........
........... माझ्या मनाचं पाखरु
.......... भाबडं वासरु..miss U !!

प्रश्न !!

या इथे मी सोडतो माझ्या खुणा
शोधशील तू नव्याने, राधिके, मला पुन्हा !

आज ही ती गात आहे, गोकुळात सानिका
सावळ्याची सावली की, शांत क्लांत मृत्तिका
भोवरा पायास माझ्या ग जुना........ १

पापणी बंद जराशी, आसवे गाली नको
जाणत्या वाटा तरीही, शापही भाळी नको
जाणता अजाणता हा का गुन्हा...... २

हीच वेळ...

हीच वेळ
आसवांना नाव देउ
हीच वेळ
भावनांना गाव देउ
हीच वेळ
आसवांना गाव का रे ?
हीच वेळ
भावनांना नाव का रे ?
हीच वेळ
मैतरांना छत देउ
हीच वेळ
वेदनांना रीत देउ
हीच वेळ
मैतरांना रीत का रे ?
हीच वेळ
वेदनांना छत का रे ?

निराश झालो नाही..

जरी अडकलो, पुन्हा नव्याने,
काही सांगणे नाही
जरी घसरलो, आज पुन्हा,
वळून पाहणे नाही !

तुटले, सुटले, किती सवंगडी,
केली ना गणती
डोळ्यांमधे ध्यास ठेवला,
मनासही कळले नाही !

गझलेसाठी आज बैसलो
गझल नाही जमली
गीतामधे अडकुन गेलो
निराश झालो नाही !

इतकच !

इतकच !

मित्र आहेत काहीच
कुणी सरळ सांगते
कुणी सांगत नाहीत
इतकच !

कुणी उगाच नाचतात
कुणी गालात असतात
मोठ्यांनं बोलत नाहीत
इतकच !

सीमारेषा आपण आखतो
स्वातंत्र्य आपण चाखतो
इतरांची आठवण येत नाही
इतकच !

मित्रा, मी तुझा आहे,
नक्की
तू पण माझा आहेस,
नक्की
अल्याडचा मी पल्याड येत नाही
इतकच !